उत्तम ग्रंथाचे वाचन व कृतीतूनच व्यक्तिमत्वाची जडणघडण होते
-डॉ.अविनाश बडगुजर

चोपडा: येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग व महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विद्यापीठस्तरीय श्रमसंस्कार व्यक्तिमत्व व नेतृत्व विकास कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या सुरुवातीला संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यशाळेचे उदघाटन डॉ.अविनाश बडगुजर (अभ्यास मंडळ सदस्य, क.ब.चौ.उमवि,जळगाव) यांच्या हस्ते कै.ना.आक्कासो. सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील (माजी शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.आशा विजय पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य डॉ.व्ही.टी.पाटील, उपप्राचार्य प्रा.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे, सौ.ललिता अशोक साळुंखे (उपशिक्षिका जि.प.प्रा.शाळा मंगरूळ) आदि मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.विशाल हौसे यांनी केले तसेच उपस्थित मान्यवरांचा परिचय डॉ.शैलेश वाघ यांनी करून दिला. यावेळी कार्यशाळेचे उदघाटक डॉ.अविनाश बडगुजर म्हणाले की, व्यक्तिमत्व विकास म्हणजे आपण कसा विचार करतो? कसे वागतो? कसे बोलतो? यांचा अंगभूत विकास होय. आतून तुम्ही कसे वागता? त्याचे प्रकटन कसे होते यावर व्यक्तिमत्व विकसित होत असते. आपण स्वतःला ओळखून, स्वताशी संवाद साधून अंतर्बाह्य स्वतःमध्ये बदल घडविणे हा व्यक्तिमत्व विकासाचा उत्तम मार्ग आहे. व्यक्तिमत्व विकासात ग्रंथ, पुस्तके महत्वाची भूमिका बजावतात. यासाठी पुस्तक, ग्रंथातील विचार अंगीकारावेत. पुस्तके आपल्याला स्वतःला ओळखायला व स्वजाणीव निर्माण करून द्यायला शिकवितात. व्यक्तिमत्व विकास हा जन्मापासून सुरु होतो. नकारात्मक भाव असलेल्या गोष्टी ह्या व्यक्तिमत्व विकासात अडथला निर्माण करतात. कृतीतून आपल्याला घडविण्याची संधी मिळते. या कृतीतूनच व्यक्तिमत्वाची जडणघडण होते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या योजना ह्या महाविद्यालायातर्फे विद्यार्थ्यांच्या हिताच्या व विकासाच्या दृष्टीने राबविल्या जातात. कर्तृत्व व आचरण ह्या गोष्टी व्यक्तिमत्व विकासात महत्वाच्या ठरतात. उत्तम व्यक्तिमत्व असलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या जीवनाचा परिचय व्हावा यासाठी त्यांच्या चरित्राचा समावेश अभ्यासक्रमात करायला हवा. त्यामुळे या गोष्टींचा प्रभाव विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत होईल. कुणाशी कसे बोलावे? कोणते व कशा प्रकारचे प्रश्न विचारावेत? विषयाची मांडणी कशी करावी? या गोष्टींही व्यक्तिमत्व विकासात भर टाकतात.
या कार्यशाळेच्या उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी केले तर आभार सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डी.डी.कर्दपवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्य यांनी परिश्रम घेतले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक बंधू-भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.












