चहार्डी ग्रामपंचायतची ग्रामसभा विविध विषयांनी गाजली….
चोपडा प्रतिनिधी:- चहार्डी ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच पार पडली. या ग्रामसभेत आम आदमी पार्टी चोपडा तालुका उपसंयोजक मुकुंद पाटील यांनी ग्रामसेवक यांना चांगलेच धारेवर धरले. गावात विविध समस्या असताना सुद्धा ग्रामपंचायत कार्यालय पूर्ण वेळ उघडे नसते व ग्रामविकास अधिकारी पूर्णवेळ का हजर राहत नाहीत . तसेच गावात समस्यांचा महापूर आहे यांसह विविध विषयांवर त्यांनी ग्रामसभेत ग्रामसेवकांना धारेवर धरले..

दिव्यांगांना त्यांचा हक्काचा निधी मिळत नाही. त्यासाठी त्यांना उपोषण करावे लागते हि लाजिरवाणी गोष्ट असल्याचे सांगितले. ग्रामसभेला प्रथमच महिलांची संख्या लक्षणीय होती .सकाळी 10 ते दूपारी २ वाजेपर्यंत ग्रामसभेत ग्रामस्थांनी आपापल्या समस्या मांडल्या. समस्या मांडतांना ग्रामस्थांच्या भावना उफाळून येत होत्या. ग्रामसेवक आजारी असल्याने त्यांनी बसूनच उत्तरे दिली.त्यामुळे नागरीक संतप्त होताना दिसून आले. १४ वा १५ वित्त आयोगातील पैसा इतर सदस्यांना विश्वासात घेऊन खर्च न केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती. ग्रामपंचायतीत मनमानी कारभार चालू असल्याचा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी केला. तसेच आम आदमी पार्टीचे तालुका उपसंयोजक मुकुंद पाटील यांनी दुषीत पाणी संदर्भात ग्रामसेवकांना विचारणा केली असता त्यात TCL पावडर टाकून पाणी शुद्ध केले जात असल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले.

गावात पूर्ण वेळ ग्रामसेवक मिळावा यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिवस पासून आम आदमी पक्षाच्या वतीने साखळी उपोषण सुरू होते. तरी यापुढे शासकिय वेळेनुसार पूर्ण वेळ ग्रामपंचायत कार्यालय उघडे राहील व ग्रामसेवक सुध्दा पुर्ण वेळ उपस्थित राहतील अशा प्रकारचा ठराव करण्यात आला आहे.तसेच जे सदस्य ग्रामसभेला गैरहजर होते त्यांना निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली व तशा ठरावाची नोंद प्रोसिडींगला केली
संपूर्ण ग्रामसभेची व्हिडिओ शुटींग करण्यात आली आहे. गावाचा विकास व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे…













