सावित्रीमाई फुले एस. बी. सेवा सहकारी संस्थेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार?
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठ्या प्रमाणावर लूट – नईम शेख यांची चौकशीची मागणी
संस्था चालक व प्रशासक तुपाशी तर कंत्राटी कर्मचारी उपाशी
चोपडा (प्रतिनिधी) – सावित्रीमाई फुले एस.बी. सेवा सहकारी संस्था, धुळे यांच्या मार्फत नगरपरिषद चोपडा येथे कंत्राटी कर्मचारी पुरवठ्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. अर्जदार नईमोदिन ऐनोदिन शेख यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल करून तात्काळ चौकशीची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरपरिषद चोपडा यांनी ऑनलाईन ई-निविदेद्वारे संबंधित संस्थेला कंत्राट दिले होते. शासकीय दरानुसार अकुशल कर्मचारीसाठी ₹५६५ व कुशल कर्मचारीसाठी ₹६५० रोज मान्य करण्यात आले असून, त्यानुसार एका अकुशल कर्मचाऱ्याचा मासिक पगार सुमारे ₹१२,४३१ इतका येतो. परंतु, प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना पूर्ण रक्कम देण्यात आलेली नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातून दरमहा ३ ते ४ हजार रुपये गुपचूप कपात करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे.

याशिवाय, संस्थाचालकांकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून वेगवेगळ्या कारणांनी पैसे वसूल करण्यात आल्याचे समोर आले आहे. २०२१ पासून २०२५ पर्यंत हा आर्थिक गैरव्यवहार चालू असल्याचे बोलले जात असून, या कालावधीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर येत आहे.
पत्रकारांनी या संदर्भात ठेकेदार शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पगारात कमतरतेची कबुली देत “लोन घेण्यासाठी पगार वाढवून दाखवले असेल” असे उत्तर दिले. मात्र पुढील विचारणा टाळत या विषयी अधिक माहिती साठी चोपडा नगरपरिषदेचा मुख्याधिकारी यांना विचारा “फोनवर काही सांगता येणार नाही, समक्ष भेटा” असे म्हणत उडवाउडवी केली. एवढेच नव्हे तर आम्ही पैसे कमवण्या साठी टेंडर घेतले होते आता ते काम आम्ही सोडले आहे “फोन ठेवा, बोलू नका” अशी धमकीसुद्धा दिली.

सदर विषयासंदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्याशी पत्रकारांनी चर्चा केली असता ते म्हणाले की, यात भ्रष्टाचार झाल्याचे आमच्या कानावर आले आहे पण जोपर्यंत कोणी तक्रार दाखल करणार नाही तोपर्यंत चौकशी करणे योग्य होणार नाही. ठेकेदारांनी काम सोडल्यामुळे ते ठेकेदार चुकीचे आरोप करत आहेत असेही मुख्याधिकारी यांनी सांगितले.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित संस्थेचे परवाना रद्द करण्यात यावा व संस्थाचालक ,चेअरमन व पदाधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.
*कंत्राटी कर्मचाऱ्यांची पगार लुट भ्रष्टाचाराचे जाळे उघडकीस!*












