संतुलित जीवन हाच यशाचा खरा मंत्र – महिला पालक मेळाव्यात माई प्रमिला गिरी यांचे प्रभावी मार्गदर्शन

पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज विद्यालयात महिलांच्या मोठ्या उपस्थितीत महिला पालक मेळावा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. दिपालीताई बोरोले होत्या.

या मेळाव्यात नित्यानंद अनुभूती संस्थेच्या संस्थापिका व अध्यात्मिक सेना महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष सौ. प्रमिला गिरी (माई) यांनी “संतुलित जीवन, यशस्वी जीवन” या विषयावर अत्यंत प्रेरणादायी व्याख्यान दिले. संतुलित विचार, सकारात्मक दृष्टीकोन व शिस्तबद्ध दिनचर्या यांचा जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व अनुभवसंपन्न मार्गदर्शनातून उलगडून सांगितले.

माई म्हणाल्या की, जीवनात संकटे, अपयश किंवा नकारात्मक घटना अपरिहार्य असतात; मात्र अशा परिस्थितीतही संयम राखून योग्य निर्णय घेणारे मनच खऱ्या अर्थाने बलवान व निरोगी असते. मन व शरीर यांचा योग्य समतोल साधल्यास यश, समाधान व आर्थिक स्थैर्य आपोआप प्राप्त होते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आजच्या आईंनी संतुलित जीवनाची सुरुवात स्वतःपासून करावी, असे आवाहन करताना त्या म्हणाल्या की, टीव्ही, मोबाईल, रील्स, पार्टी किंवा निरर्थक गप्पांमध्ये वेळ वाया घालविल्यास त्याचा थेट परिणाम मुलांच्या मानसिक जडणघडणीवर होतो. पुढील पंधरा वर्षांनंतर मानसिक आजारांनी ग्रस्त मुलांची जबाबदारी आईवरच येऊ शकते, याची जाणीव ठेवून पालकांनी आपला वेळ, सवयी व विचार संतुलित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब पंकज बोरोले यांनी धकाधकीच्या जीवनात पालकांनी मुलांसोबत वेळ घालवावा, त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात व संवादातून त्यावर उपाय शोधावेत, असे सांगितले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील यांनी सतत नवनवीन गोष्टी शिकत राहणे, सकारात्मक छंद जोपासणे व परिवाराशी नियमित संवाद साधणे हाच संतुलित जीवनाचा पाया असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा सन्मान पुस्तक भेट देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख सौ. मीना माळी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सौ. जयश्री हिंगे यांनी करून दिला. सूत्रसंचलन श्रीमती छाया बारी व सूत्र संचलन सौ. योगिता कोळी यांनी प्रभावीपणे केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More