कमी गुणांची सल आयुष्यभर राहते – मुख्याधिकारी झंवर..

महिला मंडळ शाळेत १० वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा व निरोप समारंभ

चोपडा – क्रिकेटच्या सामन्यात कॅच सोडणे ही केवळ एक चूक नसते तर ते मॅच सोडणे असते. आयुष्यात येणारी संधी नका सोडू , संधी सोडली की आयुष्यभर दुःख सहन करावे लागते. कमी गुणांची सल आयुष्यभर राहते. विद्यार्थ्यांच्या जीवनातील परीक्षा हा तणावाचा नाही तर आनंदाचा भाग आहे, असे सांगत चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी क्रिकेट खेळातील उदाहरणे देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ते येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात आयोजित इ. १० वीच्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा व निरोप समारंभात बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेश वाघजाळे, संस्थेच्या अध्यक्षा पुनम गुजराथी, उपाध्यक्षा छाया गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, मुख्याध्यापक सुनील पाटील, पर्यवेक्षक विजय पाटील व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्रा. रमेश वाघजाळे म्हणाले, गरिबी, ग्रामीण भागातील असणे, एखाद्या विषयाबद्दल असणारी भीती आणि मनातील न्यूनगंड काढून टाका. यश बुद्धीच्या वापरावर अवलंबून असतो. स्वप्न मोठी बघावी त्यामुळे प्रयत्नांना धार येते. विद्यार्थ्यांनी मोटारसायकल, मोबाईल पासून दूर राहा व चांगली संगत ठेवावी. सहवासाने माणसाचे आयुष्य घडते. मी करु शकतो या मंत्राचा ध्यास मनी कायम ठेवल्यास नक्कीच यश मिळते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा पुनम गुजराथी, छाया गुजराथी यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन अनिल महाजन यांनी तर प्रास्ताविक सुनील पाटील यांनी व आभार प्रदर्शन चंद्रकांत चौधरी यांनी केले. याप्रसंगी वैष्णवी पाटील, कनक नहाले, खुशी पाटील व पियूष बारी या विद्यार्थ्यांनी तसेच संजय बारी यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान मागील वर्षी दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More