यावल: तालुक्यातील वनोली गावात अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यास सरपंच व ग्रामसेवक असमर्थ ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. राजकीय दबावापोटी ग्रामपंचायत कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा संपूर्ण गावात रंगली आहे.
आजूबाजूच्या रहिवाशांनी दिलेल्या गट क्र. 230 ह्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले असल्याचा तक्रारारी अर्ज , सतीश योगराज चौधरी व विजय योगराज चौधरी यांनी गावात अनेक ठिकाणी अतिक्रमण केले आहे. या व्यक्तींना शासकीय घरकुल मंजूर असूनही त्यांनी ते घरकुल भाड्याने दिले आहे व गावातील विविध जागांवर अतिक्रमण केले आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तींचे मूळ गाव म्हैसवाडी असून तेथेही त्यांच्या नावे स्वतःचा उतारा आहे. वनोलीत आल्यानंतर त्यांनी अतिक्रमणास सुरुवात केली, असे ग्रामस्थांचे म्हणणेआहे.
अतिक्रमित जागेवर मोठ्या प्रमाणात आर.सी.सी. घरांचे बांधकाम केल्याचे जिओ-टॅग फोटोंमध्ये दिसून येत आहे. एकाच व्यक्तीने दोन ते तीन ठिकाणी अतिक्रमण केल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत वनोली व पंचायत समिती यावल यांच्याकडे केल्या आहेत.
विशेष म्हणजे, अतिक्रमणधारक वकिलामार्फत ग्रामपंचायतीला नोटीस पाठवून ग्रामपंचायतीने दिलेली नोटीस चुकीची व खोटी असल्याचे म्हणत आहेत. याचा अर्थ अतिक्रमणधारक गावातील ग्रामस्थांनाच चुकीचे ठरवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तरीदेखील ग्रामपंचायत संबंधितांवर कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई करत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ग्रामसेवक प्रवीण चौधरी कोणत्या भीतीपोटी कारवाई करत नाहीत, तसेच सरपंच यांच्यावर काही राजकीय दबाव आहे का, असे प्रश्न ग्रामस्थांसमोर उभे राहिले आहेत. राजकीय दबावापोटीच अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यास अधिकारी असमर्थ ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. अतिक्रमणधारक ग्रामपंचायतीला जुमानत नसल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.
या विषयावर यावल तहसीलदार, पंचायत समिती गटविकास अधिकारी यावल व ग्रामपंचायत वनोली यांना अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही आतापर्यंत कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. ‘फक्त नोटीस पाठवत आहोत’ असे उत्तर देऊनही अनेक दिवस उलटून कारवाई का होत नाही, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
ग्रामस्थांनी जीओ-ट्रॅकिंग फोटोसह उतारे काढून पुरावा म्हणून ग्रामपंचायतीला दिले आहेत. तरीदेखील ग्रामपंचायत कारवाई करण्यास असमर्थ ठरत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.ह्या प्रकारणी अधिकाऱ्यांशी फोन वर संपर्क केला असता कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही












