नराधमाला फाशी झालीच पाहिजे!” — नरसापूर प्रकरणावर चोपड्यात संतापाचा ज्वालामुखी

चोपडा (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे निष्पाप चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने चोपडा शहर आणि तालुकाअक्षरशः हादरून गेले. या क्रूर घटनेच्या निषेधार्थ चोपडा बहुभाषिक ब्राह्मण संघटनेच्या नेतृत्वाखाली संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आणि परिसर संतापाच्या घोषणांनी दणाणून गेला.

 

“नराधमाला फाशी झालीच पाहिजे!” अशा तीव्र आणि संतप्त घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या आंदोलनात संघटनेचे सर्व पदाधिकारी, समाजातील सर्व स्तरातील कार्यकर्ते तसेच समस्त बहुभाषिक ब्राह्मण समाजातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर संताप आणि वेदना स्पष्ट दिसत होती.

या वेळी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले तसेच चोपडा तालुक्याचे तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी भाऊसाहेब थोरात यांना समस्त बहुभाषिक ब्राह्मण समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.

 

निवेदनात या अमानुष घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यासाठी स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) नेमण्यात यावे आणि जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देताना

 

या हृदयद्रावक घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. समाजातील सर्व स्तरातून एकच आवाज घुमत आहे — “या क्रूरतेला आता कठोर उत्तर मिळालेच पाहिजे!” अशी मागणी निवेदनद्वारे करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More