चोपडा तालुक्यात कोरोना काळात धोकादायक अवैध प्रवासी वाहतूक
पोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

चोपडा प्रतिनिधी :—-
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अवैध प्रवासी वाहतुकीने कहर केला असून अवैध प्रवासी वाहतूक कोरोना वाढीस हातभार लावत आहे असेच म्हणावे लागेल . विना मास्क फिरणाऱ्यांवर शासन दोनशे रुपये दंडात्मक कारवाई करीत आहे आणि एका गाडीत नऊ ते दहा प्रवासी क्षमता असून सुमारे 35 ते 40 प्रवासी कोंबड्यासारखे कोंबलेले असतात तर काही मागे लटकलेले असतात तर काही प्रवासी टपावर खुलेआम बसतात एवढे अभय कोणाच्या आशीर्वादाने अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे हा मुख्य चर्चेचा विषय आहे .

चोपडा तालुक्यात वाहतूक पोलिसांचे अस्तित्वच कुठे दिसत नाही .काही ठिकाणी तर वाहतूक पोलिस आणि नियमबाह्य खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे संबंध इतके मधुर आहेत की जणूकाही वाहतूक पोलिसांकडून खाजगी वाहतूकदारांना कोणताही धोका कधीच होऊ शकणार नाही ? त्यामुळे एका रिक्षात किंवा टॅक्सीत प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक प्रवासी असतात ,काही वेळा तर थेट टॅक्सीला मागे लटकलेली असतात , किंवा वर टपावर बसून प्रवाशांची वाहतूक होतांना चोपडा तालुक्यात सर्रास दिसते .
चोपडा तालुक्यातील नागलवाडी , बोरअजंटी , वैजापूर , लासुर , सत्रासेन ,उमार्टि हे गावे अवैध प्रवासासाठी व वाहतुकीसाठी कुप्रसिद्ध आहेत . अश्या प्रकारच्या वाहनांना कधी एखादा अपघात झाल्यास वाहतूक पोलिसांकडून काही दिवस कारवाईचे नाटक केले जाते , नंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे होते .

ग्रामीण भागातील जवळपास बहुतेक बस स्थानकांना खाजगी प्रवासी वाहतूक – दारांच्या गराडा असतो . या वाहतूकदारांचे दलाल बसस्थानकातून प्रवासी खासगी वाहतुकीकडे पळवितात , खाजगी प्रवासी वाहतूकदारांना दिवसातून अधिकाधिक फेऱ्या करून कमाई करावयाची असल्याने त्यांच्याकडून वाहन चालविताना सुरक्षितते ऐवजी वेगाला अधिक प्राधान्य दिले जाते त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते . अश्या या कोरोना काळात सामाजिक अंतर नियमावलीचे पालन न करता , अवैध प्रवासी वाहतुकीमुळे कोरोना संसर्ग वाढीस निश्चितच मदत करणाऱ्या बेजबाबदार वाहन चालक व त्यांना अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे नेमकी काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे …..












