तांत्रिक कारणामुळे आडगावला भीषण पाणीटंचाई
चोपडा प्रतिनिधी :—-

तालुक्यातील आडगाव या गावी तांत्रिक अडचणीमुळे भीषण पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे . त्यात ग्रामसेवक दोन महिने प्रदीर्घ रजेवर असल्याने टंचाई निवारण वेळेत होत नसल्याने ग्रामस्थांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत .
आडगावात सानेगुरुजी नगर , डाबर गल्ली , मरिमाय नगर , भीलवाडा , हरिजन वस्ती इत्यादी भागात समन्यायी पाणी पुरवठा होत नाही.

मात्र गावातल्या मधल्या भागातील ग्रामस्थांना कधीच पाणीटंचाई भासत नाही . पाणीपुरवठा कर्मचारी मन मानेल तसे वागतात . जुनी पाईप लाईन वारंवार फुटते. विज असते तर मोटारी नादुरुस्त होतात या अनेक तांत्रिक कारणांमुळे वारंवार पाणीपुरवठा खंडित होतो .अक्षय तृतीया सणाला गावात पाण्याचा ठणठणाट झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे . सरपंच रावसाहेब पाटील वसुली आड आपली जबाबदारी टाळतात तर कर्मचारी म्हणतात सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे द्यावेत आम्ही गाव चालवून दाखवू अशा वादात कुणी कैफियत कुणाकडे मांडावी? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . तरी जि प कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी दखल घ्यावी अशी मागणी होत आहे…













