चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना संचालकांनी बैठकीकडे फिरविली पाठ ..
चोपडा दि.२९ महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क
चोपडा साखर कारखाना संचालक मंडळाची २९ सप्टेंबर रोजीच्या आयोजित सभेकडे संचालक मंडळाने पाठ फिरवल्याने तहकूब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.आजच्या बैठकीत काही महत्वपूर्ण मुद्यावर परखड चर्चा होण्याचे प्राथमिक संकेत मिळाल्याने गाशा गुंडाळण्यात आल्याची जोरदार चर्चा सभासदांमध्ये आहे.कारखान्यात लाखोंचे भंगार गायब झाल्याचे वादळं उठल्यानंतर चौकशी सुरू असल्याने काहींची धकधक वाढल्याने सभा वादळी होण्याची शक्यता होती.


कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक यांच्या सहीने दि.२२सप्टेंबर रोजी संचालकांसाठी सभेचा अजेंडा निघाला होता. ती सभा आज दि २९ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली होती .तशी वार्षिक सर्वसाधारण सभा
दि. 30 सप्टेंबर च्या आत घेणे हे बंधनकारक असते. त्या अनुषंगाने ही सभा ठेवण्यात आली होती.मात्र कारखान्यात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप तथा तक्रारी काही संचालकांनी केल्याने चौकशीचे गुऱ्हाळ सुरू झाले आहे या सर्व हालचाली पाहता बैठक बऱ्याचशा सभासदांनी सभेकडे पाठ फिरवल्याने सभा तहकूब झाल्याची माहिती समोर आली आहे.

आजच्या सभेला १८ पैकी फक्त ५ सभासद हजर असल्याची माहिती संचालक विजय दत्तात्रय पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून दिली. संचालकांच्या मासिक मीटिंगमध्ये खर्चाचा गोषवारा देण्यास चेअरमन टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे संचालकांमध्ये अस्वस्थता व नाराजी असल्यामुळे आज रोजी झालेल्या मासिक मीटिंगमध्ये संचालकांनी चेअरमन यांच्यावर अविश्वास दर्शवित मीटिंग कडे पाठ फिरवली असल्याचे सूत्रांकडून समजते.या बैठकी संदर्भात अधिकृत माहितीसाठी चेअरमन अतुल ठाकरे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही तसेच एम .डी. पिंजारी यांच्याशी संपर्क झाला असता त्यांनी मी बाहेर गावी असून चेअरमन यांच्याकडे माहिती मिळेल असे सांगितल्याने कारखान्याचे विद्यमान चेअरमन अतुल भीमराव ठाकरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी आजच्या सभेबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला व तुम्हाला ज्यांनी बातमी दिली आहे त्यांच्याकडून अधिक माहिती घ्या व तुम्ही बातमी लावा आम्ही उद्या पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले…













